इस्लामपूर : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘ग्लोबल मीट’ उत्साहात पार पडली. पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे २०० उद्योगपतींनी ‘राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आरआयटी) ‘ग्लोबल मीट’ या उपक्रमास हजेरी लावली. यातील अनेक उद्योजकांनी इन्स्टिट्यूटच्या दर्जाचे भरभरून कौतुक केले आणि भविष्यात एकत्र येऊन ‘आरआयटी’च्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘आरआयटी’च्या संचालिका सुषमा कुलकर्णी, ‘केईएस’चे सचिव आर. डी. सावंत, प्रा. शामराव पाटील या वेळी उपस्थित होते.
‘मनोरमा इन्फोसोल्युशन्स’च्या अश्विनी दानीगोंड म्हणाल्या, ‘‘आरआयटी’च्या विकास संशोधन प्रकल्पात गुंतवणूक करण्याची आमची इच्छा आहे. भविष्यात ‘आरआयटी’च्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेत प्राधान्य देऊ.’ ‘‘आरआयटी’च्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी देऊ,’ असे ‘स्कायलार्क इन्फोटेक’चे सीईओ कैलास मेढे यांनी सांगितले.
सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नितीन कोळेकर यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. तसेच, ‘आमच्याशी थेट संपर्क साधा, पूर्ण सहकार्य करू,’ अशी ग्वाही दिली आणि ‘मध्यस्थांच्या आहारी जाऊ नका,’ असे आवाहनही केले.
मुंबई येथील ‘एफट्रॉनिक्स प्रा. लि.’चे मारुती पवार, ‘सॅटर्डे क्लब’चे सचिव नरेंद्र बगाडे यांनी व्यावसायिक टिप्स देतानाच एकमेकांच्या सहकार्याने आपापला व्यवसाय उभा करण्याचे, त्याला गती देण्याचे आवाहन केले.
या वेळी डॉ. सुषमा कुलकर्णी, कासेगांव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, राजारामबापू सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. श्यामराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले. इंडियन ओव्हरसीज बँक व बँक ऑफ इंडियाचे माजी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अशोक दुगाडे यांनी आर्थिक नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. मुंबई येथील जीवनविद्या मिशनचे सुभाष केळकर व आशिष कुलकर्णी यांनी वामनराव पै यांचे तत्त्वज्ञान व ‘ताणतणावाचे नियंत्रण’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. एम. टी. तेलसंग यांनी उपस्थित मान्यवर व उद्योजकांचे स्वागत करून प्रास्ताविकाच्या भाषणात राज्यातील उद्योजक व इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सूर्यकांत दोडमिसे यांनी आभार मानले. डॉ. आनंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत दोडमिसे, अर्जुन थोरात, गोरेश राव, चिन्मय मुतालिक यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात मोलाचे योगदान दिले.